सुंदर ते ध्यान
सहज साध्य असे जरी
संत हे भारताचे वैभव आहे. ते प्रसिद्धी पराङ्मुख असतात. त्यांना शक्तिपात महायोग साधनेने उच्च आध्यात्मिक अवस्था प्राप्त झालेली असते. अशा संतांचे ‘सहज बोलणे’ याला विशेष महत्त्व असते. त्यांच्याकडून अलौकिक कार्य आपोआप घडते. हे घडलेल्या प्रसंगामधून पाहू.
हरिद्वारजवळील कनखल गावात श्रीमहानंदगिरि नावाचे बंगाली महात्मा होऊन गेले. ते पूर्वी भारतीय रेल्वे विभागात अधिकारी पदावर नियुक्त होते. त्यावेळी त्यांच्यावर नव्या रेल्वे लाईनच्या स्थापनेची जबाबदारी होती. ते जागेचे निरीक्षण करीत होते. त्यावेळी त्यांना रेल्वे मार्गात एका महात्म्यांचा आश्रम दिसला. ते आश्रमाजवळ आले. तिथे उपस्थित असलेल्या महात्म्यांना ते म्हणाले “आपला आश्रम रेल्वेच्या मार्गावर आहे. तो काढावा लागेल.” महात्मा शांतपणे म्हणाले “रेल्वे लाईन दुसरीकडून काढली तर फायदेशीर ठरेल. माझ्यावर विश्वास नसेल तर तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला विचारा.” महानंदगिरी कार्यालयात निघून गेले. महात्मा आश्रमामध्ये परतले.
महात्मा अतिशय कष्टी झाले होते. त्यांचे हृदय द्रवले आणि चित्तशक्ती क्रियाशील झाली. संतांना वेगळा संकल्प करण्याची आवश्यकता नसते. संतांची चित्तशक्ती सामर्थ्यशाली असते. या सामर्थ्यामुळे कार्यालयात बसून रेल्वे लाईनच्या नकाशाचे निरीक्षण करीत असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मनात विचार आला “अरे बापरे! हा नकाशा चुकीचा आहे. रेल्वे लाईनचा मार्ग बदललाच पाहिजे.” त्यांनी विनाविलंब नव्या मार्गाचा नकाशा तयार केला. तातडीने महानंदगिरींना बोलावून ते म्हणाले “रेल्वे लाईन आश्रमाकडून न नेता या नव्या नकाशाप्रमाणे दुसऱ्या मार्गानेच गेली पाहिजे.” त्याप्रमाणे रेल्वे लाइनचे काम पूर्ण झाले. आश्रमही सुरक्षित राहिल्याने महात्म्यांना आनंद झाला.
वरिष्ठ अधिकाऱ्याचा बदललेला निर्णय ऐकून श्रीमहानंदगिरींना महात्म्यांच्या सूचनेची आठवण झाली. त्यांना पश्चात्ताप झाला “अरेरे! त्या महात्म्यांशी आपण कसे वागलो ! हे बरोबर नाही.” महानंदगिरी महात्म्यांना शरण गेले. त्यांनी महात्म्यांची क्षमा मागितली. महात्म्यांनी त्यांना जवळ केले. महानंदगिरी महात्म्यांच्या सेवेमध्ये राहून आश्रमाची व्यवस्था पाहू लागले. पुढे महानंदगिरींनी आश्रमाची धुरा समर्थपणे सांभाळली.
सारांश, शक्तिपात महायोग एक विज्ञान आहे. संतांच्या ‘सहज बोलण्याने’ परिवर्तन होते हेच रहस्य आहे. तात्पर्य, संत सांगतात,
‘सहज साध्य हा मार्ग असे जरी पंथराज हा ऐक्याचा’
……………………..