श्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे

सुंदर ते ध्यान

देव माझा मी देवाचा

श्रीमद्भागवतामध्ये “या भारतभूमीतच परमात्मा जन्म घेतो” असे म्हटले आहे. म्हणून भारतभूमी ही देवभूमी आहे. या देवभूमीत मनुष्याने स्वधर्माचे पालन केले पाहिजे. जो स्वधर्मपालन करीत नाही तो प्राणीमात्रासारखा आहे. हे गुरु-शिष्य संवादातून समजावून घेऊ.

श्रीगुरूदेवांचा हा वरील उपदेश ऐकून शिष्य म्हणतो “मला समजले नाही.” श्रीगुरुदेव म्हणतात “तुला प्रत्यक्ष दाखवतो. चल माझ्याबरोबर.” गुरुदेव शिष्याला गावातील महादेवाच्या मंदिरात आणतात. “हे पहा” असे म्हणून गुरुदेवांनी शिष्याला दृश्य दाखविले. एका तांदळाच्या दाण्यासाठी महादेवाच्या डोक्यावर उंदीर चढला होता. मांजराला नैवेद्याचे दूध पीत असतांना उंदीर दिसला. उंदीर धरण्यासाठी मांजर धावले. त्यामुळे देव्हाऱ्यातल्या अनेक वस्तूंची उलथापालथ झाली. महादेवाच्या पिंडीवरून मांजराची व उंदराची पळापळ चालली होती. हे पाहून शिष्य म्हणतो “अरे बापरे! हे काय?” गुरुदेव म्हणाले “मांजराला व उंदराला फक्त खाण्याची, विषयाचीच आवड आहे. आपण देवाच्या अंगावरून पळापळ करीत आहोत याचे त्यांना दुःख नाही कारण “हा देव आहे” याची त्यांना जाणीव नाही. “आपण मंदिरात भांडत आहोत” याचेही भान नाही कारण देव, धर्म वगैरे जाणण्याचे त्यांना ज्ञान नाही.”

गुरुदेव शिष्याला समजावतात “हे बघ! मानवाला भगवंताने शरीर, मन, बुद्धी दिली आहे. परंतु देवाजवळ राहूनही, ‘देव आहे’ हे ज्ञान असूनही आपापसातच भांडत आहोत याचे मनुष्याला भान नाही. हे आज सर्वत्र दिसत आहे.” शिष्य म्हणाला “होय गुरुदेव.” गुरुदेव सांगतात “भगवद्गीतेमध्ये श्रीभगवंत म्हणतात “आपल्या आवडत्या देवतेचे श्रद्धेने पूजन करा व स्वतः आनंदित होऊन सर्वांना आनंद द्या.” असे भगवंताने प्रत्येकाला स्वातंत्र्य दिले आहे. असे असूनही स्वतःला धार्मिक समजणारे भगवंताच्या आज्ञेचे पालन करीत नाहीत, आपापसात भांडत बसतात आणि आपले जीवन निष्फळ करतात.” शिष्य विचारतो “मग यासाठी उपाय काय?” गुरुदेव म्हणतात “यासाठी त्रिसूत्री आहे. एक, दैनंदिन श्रद्धायुक्त समर्पण भावनेने महायोग साधना करणे, दोन, संतसंगती करणे आणि तीन, भगवंतांच्या आज्ञेचे पालन करणे. यामुळे प्रत्येक मानवामध्ये परिवर्तन होते. हे सत्य आहे.” हे ऐकून शिष्य आनंदित झाला. 

तात्पर्य, सर्वश्रेष्ठ अशा एकमेव राष्ट्रधर्म पालनासाठी सर्वांनी गुण्यागोविंदाने राहावे हेच याचे मर्म आहे. संत सांगतात

‘देव माझा माझा माझा, मी देवाचा’

……………………..

तुम्हापाशी देव आहे >>

<< हा योग युक्तीचा