श्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे

सुंदर ते ध्यान

जेथे काम तेथे उभा श्याम

मानवाला अध्यात्मामध्ये प्रगती करावीशी वाटते आणि व्यवहारही उत्तम व्हावा असे वाटते. म्हणून मानवाने अध्यात्म आणि व्यवहार स्वतंत्र ठेवावेत आणि दोन्ही बाबींमध्ये प्रामाणिकपणा असावा म्हणजे समाधान प्राप्त होते. म्हणून प्रत्येकाने प्राप्त झालेली उपासना, साधना उत्साहाने करावी. ‘उत्साह’ जीवनाला चालना देणारी ‘प्रेरकशक्ति’ आहे. हा विषय गुरु-शिष्य संवादातून समजावून घेऊ.

एकदा शिष्याने विचारले, “गुरुदेव, कष्टाविना सर्व गोष्टी मिळाल्या तर मनुष्य किती सुखी होईल!” गुरुदेव म्हणाले “असे नाही. तुला एक उदाहरण देतो. भोजन वाढले तरी हाताच्या खटपटीशिवाय अन्न पोटात जाईल का?” शिष्य म्हणाला “नाही.” गुरुदेव म्हणाले “बरोबर. तिथे दोन लाकडे पडली आहेत ना, ती एकमेकांवर घास.” शिष्य दोन लाकडे काही वेळ घासत बसला. मग एक ठिणगी उडाली. गुरुदेव म्हणाले “बघितलेस, लाकडे एकमेकांवर बऱ्याच वेळ घासल्यावरच अग्नि उत्पन्न झाला.” शिष्य म्हणाला “होय गुरुदेव.” गुरुदेव म्हणाले “तुला आणखी एक प्रयोग सांगतो. कुदळ घे आणि इथे जमीन खांदत जा.” शिष्य कुदळीने जमिनीतील माती काढतो. 

बऱ्याच वेळाने पाणी लागले. ते पाहून गुरुदेव म्हणाले “बघितलेस का? तू जमीन खोलवर खणल्यावरच पाणी लागले. म्हणून प्रयत्न करण्यास कधीही माघार घेऊ नये. ‘उत्साह’पूर्वक योग्य मार्गाने कष्ट करणाऱ्याला सफलता मिळते.” शिष्य म्हणाला “गुरुदेव उत्साहाने प्रयत्न करणेच उत्तम आहे.” गुरुदेव म्हणाले “तुला आणखी एक घडलेला प्रसंग सांगतो. एकदा एका धनिकाने शामियानात सर्वांना जेवण दिले. मिष्टान्न खाऊन सर्वजण तृप्त झाले. धनिकाने रस्त्यावरील काम करणाऱ्या मजूराला विचारले “तूं जेवलास कां?” कामगार म्हणाला “आयते जेवण घेतले तर मी आळशी होईन. माझ्या कष्टाची भाकरीच मला नेहमी ‘उत्साह’ देणारी आहे.” ते ऐकून धनिक खाली मान घालून निघून गेला.”

गुरुदेव म्हणाले “त्या सामान्य मजूराने ‘भिक्षापात्र अवलंबिणे | जळो जिणे लाजिरवाणे ||’ हे मर्म जाणल्यामुळे त्याने धनिकाला जिंकले. हे रहस्य आहे.” गुरुदेवांनी सांगितले “महायोग साधनेने आत्मिक बळ वाढते. ‘श्रमचि देव |’ हा अनुभव येतो. हेच यशस्वी जीवनाचे सूत्र आहे.”

तात्पर्य, सध्या सर्वत्र नैराश्य, कष्ट न करता आयते मिळावे ही प्रवृत्ती बळावत आहे. यात कुटुंब, समाज, राज्य, राष्ट्राचे नुकसान आहे. म्हणून संत सांगतात

‘जेथे काम तेथे उभा श्याम ||’

……………………..

हा योग्य युक्तीचा >>

<< पिंडी ते ब्रह्मांडी