सुंदर ते ध्यान
तुम्हापाशी आहे देव
श्रीभगवंतच मनुष्य, प्राणी इत्यादी जीवांना जन्म देतो. हे सत्य आहे. मानव जन्माची प्राप्ती श्रीभगवंताचीच कृपा आहे. मनुष्य जन्म देण्याचे कारण असे की या जन्मामध्येच मानवाला आपला उद्धार करून घेण्याचा अधिकार आहे. मनुष्य जन्मातच परम आनंदाची प्राप्ती होते. म्हणून प्रत्येक मानवाने आपल्या उद्धारासाठी प्रयत्न केलाच पाहिजे. हा विषय स्वामीजी आणि साधक यांच्यातील संवादातून समजावून घेऊ.
साधक स्वामींना विचारतो “स्वामीजी, उद्धार करून घेणे म्हणजे काय?” स्वामीजी सांगतात “देवाचे नाव, गुरूंकडून प्राप्त साधना, संतांचे ग्रंथ आणि संतसंगती यांच्यामुळे मानवाचा उद्धार होतो.” साधक म्हणतो “स्वामीजी, मला समजले नाही.” स्वामीजी सांगतात “अरे साधका! वरील गोष्टी भगवंतानेच आपल्या उद्धारासाठी दिल्या आहेत. म्हणून वेळ न घालवता वरील बाबी उत्साहाने केल्याच पाहिजे. परंतु “आपले कल्याण होईल का नाही?” याची मात्र चिंता करीत बसू नये. आपल्या जन्माच्या पूर्वीपासून भगवंताने काळजीपूर्वक सर्व साधन सामग्री तयार करून ठेवली आहे. तोच श्रीभगवंत पुढेही व्यवस्था करणार आहे हे निश्चित म्हणून काळजी नसावी. तुला एक उदाहरण देतो. तुझ्या मित्राने तुला भोजनाचे निमंत्रण दिले. तू त्याच्याकडे गेलास. तुला दिसले की जेवणाची सर्व तयारी करून ठेवली आहे. सर्व पदार्थही समोर तयार आहेत. अशा वेळी “मी आलो खरा, पण मित्र नक्की भोजन देईल ना?” अशी तुझी चिंता योग्य आहे का?” साधक म्हणतो “नाही स्वामीजी.” स्वामीजी म्हणतात “बरोबर. भोजन द्यायचे नसते तर मित्राने तुला निमंत्रणही दिले नसते आणि तयारीही केली नसती. परंतु त्याने निमंत्रण दिले, तयारी केली, म्हणजे भोजन मिळणारच आहे. आता जे पदार्थ वाढले जातील ते सेवन करावे एवढेच!” साधक म्हणतो “होय स्वामीजी.” स्वामीजी समजावतात “त्याचप्रमाणे भगवंतांनी मनुष्य जन्म, देवाचे नाव, साधना, संतग्रंथ आणि संतसंगती जुळवून दिले आहे. त्यामुळे आपला उद्धार होणारच असा दृढ विश्वास ठेवला पाहिजे. समजले का तुला?” साधक म्हणतो “होय समजले. आपल्या उपदेशाचे मी पालन करीन.” तो स्वामीजींना नमस्कार करतो.
तात्पर्य, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज सांगतात
धरा बळकट भाव, तुम्हापाशी आहे देव ।
कारे हिंडता रानोरानी, पुसा संतांसी जाऊनी ।।
……………………..