tembe-swami-round
swami-loknath-terth-round
श्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे

सगुण निर्गुण

स्मृती स्मरण

वायुपुराणामध्यें स्मृतिची व्याख्या आहे – ‘वर्तमानानि-अतीतानि तथैव अनागतानि-अपि। स्मरते सर्वकार्याणि तेनासौ स्मृतिरुच्यते।।’. भूतकाळांत घडलेली, चालू काळांत घडत असलेली आणि भविष्यकाळांत घडणारीं सर्व कार्यें ज्यामुळें स्मरलीं जातात त्या विशिष्ट मनोव्यापाराला ‘स्मृति’ म्हणतात. स्मृति म्हणजे स्मरण, संस्कारजन्य ज्ञान, अनुभवलेल्या विषयांचें ज्ञान किंवा अनुभवलेल्या विषयांचें कालांतरानें होणारें नेमकें ‘स्मरण’. ‘स्मृति ही देवी’ मानलेली आहे. म्हणून मार्कण्डेय पुराणांतील सप्तशतीमध्ये, “जी देवी सर्व प्राणीमात्रांमध्ये ‘स्मृतिरूपाने’ सुस्थिर आहे, तिला नमस्कार असो” असा उल्लेख आहे. 

वेगवेगळ्या संदर्भातून स्मृतिचे महत्त्व वर्णिलेले आहे. श्रीस्वामिमहाराजांनी नवविधा भक्तिचे वर्णन करताना ‘स्मरणभक्ति अति श्रेष्ठ।’ असे सांगून ती नऊ भक्तिंमध्ये श्रेष्ठ असणारी, आठ भक्तिंना व्यापणारी आणि भगवंताला प्रिय असणारी आहे. आपले स्मरण करणाऱ्या भक्ताबरोबर राहणारा म्हणून श्रीदत्तप्रभूंना ‘स्मरणमात्रसंतुष्टाय’ असे म्हणतात. मानवी जीवनात भगवंताचे विस्मरण हीच आपत्ती व त्याचे स्मरण हीच संपत्ति (‘संपन् नारायणस्मृतिः।’) आहे. प्रत्यक्ष भगवंताने “माझे स्मरण कर (‘माम् अनुस्मर।’)” असा उपदेश अर्जूनाला केला. तसेच राष्ट्रसंतांचेही स्मरण प्रेरणादायी असते म्हणून सर्वजण ‘तव स्मरण सतत स्फुरणदायी आम्हा घडो।’ असे म्हणतात.

एक घडलेली घटना पाहू. उन्हाळ्याचे दिवस असल्याने, दोन मित्र पोहायला जातात. त्यातील एक मित्र बुडत असतांना दूसरा मित्र वाचवतो. पाण्यातून बाहेर आल्यावर, मदत करणाऱ्या मित्राबद्दलचे उद्गार “माझ्या मित्राने माझे प्राण वाचविले” असे पहिला मित्र पाषाणावर कोरतो. दुसरा त्याला विचारतो, “तू हे कां कोरलेस?” पहिला म्हणतो, “अरे, जेव्हा आपल्यासाठी कोणी चांगले कार्य करतो, ते आपण ‘स्मृतिरूपी मनावर’ कोरावे म्हणजे त्याचे विस्मरण होत नाही.” ही कृतज्ञता प्रत्येकाच्या जवळ असलीच पाहिजे. कृतज्ञता ही भगवंताचीच उपासना आहे. 

‘स्मरणभक्ती’ प्रत्येकाकडून घडावी म्हणून संतांनी खूप सोपा उपाय सांगितला आहे – प्रत्येकाने येतांना जाताना, काम करतांना, खाण्यापिण्याच्यावेळी तसेच देवाणघेवाण करतांना, सर्ववेळी प्रेमाने ‘भगवत्स्मरण’ करावे. त्यामुळें ‘मी कृती करतो’ हा भाव निघून जातो व ‘देवच’ प्रत्येक कृती करतो असा विश्वास निर्माण होतो. असा भक्त जीवनात यशस्वी होतो. या उपदेशाचे आपण पालन करून आनंद घेऊ या.

……………………..

स्तुती >>

<< आईची शिकवण