tembe-swami-round
swami-loknath-terth-round
श्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे

सगुण निर्गुण

स्वावलंबन

संतश्रेष्ठ सांगतात, ‘यद् आत्मवशं स्यात्’ म्हणजे ‘स्वावलंबी व्हावे आणि परावलंबनाचा त्याग करावा.’ ‘स्वावलंबन’ म्हणजे ‘स्व+अवलंबन,’ आपण स्वत: मेहनत करणे, कठीण प्रश्न स्वत: सोडवणे, स्वत:वर अवलंबून असणे, आपल्या प्रयत्नांवर विश्वास ठेवून स्वत:च्या खटपटीने कार्य साधणे याला ‘स्वावलंबन’ म्हणतात. स्वत: कोणतेही प्रश्न सोडवले की ते चांगले लक्षात राहतात. दुसर्‍याकडून सोडवून घेतले तर ते तात्पुरतेच लक्षात राहतात. त्यामुळे ‘स्वावलंबनाचा’ फायदा मोठा आहे. एक सुभाषित आहे, ‘जो मनुष्य ‘स्वावलंबी’ आहे, तो धनिक नसला तरी खरा ऐश्वर्यसंपन्न आहे.’

एखादे यंत्र कार्यरत नसेल तर ते जसे नादुरुस्त होते, तशी स्थिती परावलंबनामुळे आपल्या मनोवृत्तीची होते. आपल्याला मानसिक दुर्बलता प्राप्त होते. परावलंबनात पराभवाची भावना असते कारण मनुष्य प्रत्येक गोष्टीसाठी दुसर्‍याकडून मदतीची, दयेची अपेक्षा करतो. असा मनुष्य जीवनात अपयशी होतो. याउलट ‘स्वावलंबी’ मनुष्य दृढनिश्चयी असतो. तो संघर्षातही नवीन अनुभव प्राप्त करतो आणि यशाचे नवेनवे शिखर गाठतो. त्याच्यासाठी काहीच अशक्य नाही. ‘स्वावलंबना’मुळे मनुष्य कठोर परिश्रम करून स्वबळावर आपला उद्देश्य साध्य करण्यात यशस्वी होतो. समाज त्याची प्रशंसा करतो, त्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवतो, त्याचा सन्मान करतो. असा संघटित ‘स्वावलंबी’ तरुण समाज राष्ट्राला बलशाली बनवतो.  

‘स्वावलंबनाचे’ महत्त्व सिंहाच्या उदाहरणावरून समजावून घेऊया. सिंहाला जंगलाचा राजा म्हणतात. हे राजेपण त्याने स्वत:च्या बळावर प्राप्त केले आहे. असा पराक्रमी असणार्‍या सिंहाला राजा बनण्यासाठी राज्याभिषेक सोहळ्याची आवश्यकता नसते. आपल्या पराक्रमांमुळे तो ‘मृगेंद्र’ म्हणविला जातो. ‘श्रेष्ठ राजा बनणे’ हे दुसर्‍यावर अवलंबून नसून ‘स्वावलंबना’मुळेच त्याची प्राप्ती होते. म्हणून ‘स्वयमेव मृगेंद्रता’ हे वचन सुप्रसिद्ध आहे. ‘स्वावलंबनामुळे’ असे श्रेष्ठत्व प्राप्त केलेले महात्मे भारतात आहेत. ते तरुणांसाठी आदर्श आहेत.

‘स्वावलंबनाचे’ तात्पर्य समर्थ रामदासस्वामी सांगतात –

जो दुसऱ्यावरी विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला|

जो स्वयेची कष्टला, तोचि भला||

……………………..

एकु गोविंद रे >>

<< उत्साह